साहित्यप्रेमी भगिनी मंडळ

साहित्यप्रेमी भगिनी मंडळ ही सुयोग्य आणि अर्थपूर्ण नाव धारण करणारी संस्था सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात प्रतिष्ठित व नामांकित आहे. साहित्य क्षेत्रात निरनिराळे उपक्रम राबवत या संस्थेने चाळिशी ओलांडली आहे. चाळीस वर्षापूर्वी साहित्यावर समरसून प्रेम करणाऱ्या भगिनी एकत्र आल्या आणि साहित्यप्रेमी भगिनी मंडळाची संकल्पना रुजली. साहित्यप्रेमी भगिनींनी अधूनमधून एकत्र जमावे, काही विचार विनिमय करावा, पुस्तक चर्चा करावी असा हा एकत्र जमण्यामागचा उद्देश होता. १९६५ सालच्या आसपास या उपक्रमात श्रीमती संजीवनी मराठे, श्रीमती पद्मा गोळे, श्रीमती शांता किर्लोस्कर, श्रीमती रजनी पटवर्धन सहभागी झाल्या. या भागिनींच्या प्रोत्साहनाने आणखी दहाबारा भगिनी या उपक्रमात हळूहळू सहभागी झाल्या. दरमहा बैठका होऊ लागल्या. या बैठकीत साहित्यकृतींचे परीक्षण-रसास्वाद घेणे, भगिनींच्या वाङ् मयकृतींचे वाचन-श्रवण होऊ लागले.सुरुवातीची बैठक कोणा एखाद्या भगिनींकडे भरत असे.         
  १९६९ सालापर्यंत मंडळाच्या कामकाजाला एक निश्चित आकार येवू लागला. याच सुमारास – महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या— सभागृहात दरमहा कार्यक्रम करण्यास सुरुवात झाली. साहित्यिक उपक्रम करणारे मंडळ या नात्याने परिषदेने अत्यंत अल्प मोबदल्यामध्ये मंडळाला जागा उपलब्ध करून दिली. तेव्हापासून आजतागायत मंडळाचे कार्यक्रम साहित्य परिषदेच्या सभागृहात पार पडतात. सुरवातीच्या काळात श्रीमती संजीवनी मराठे, श्रीमती शांता किर्लोस्कर आणि त्यांच्या नंतर श्रीमती सुमन बेहेरे, श्रीमती शैलजा राजे यांनी मंडळाच्या सेक्रेटरीपदाची धुरा सांभाळली. हळूहळू मंडळ वर्धिष्णू होत गेले. नवीन सभासद, नवीन सेक्रेटरी यांच्या कल्पनेतून वेगवेगळे उपक्रम सुरू झाले. यांनी रुजवलेल्या या रोपट्यावर वाङ् मयासंबंधीचे आपले अपरंपार प्रेम शिंपून पुण्यातील अनेक नामवंत लेखिकांनी हे रोपटे वाढविले आणि आता त्याचा एक मोठा वृक्ष झाला आहे. आज साहित्यप्रेमी भगिनी मंडळ ही पुण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक नामवंत साहित्यिक संस्था म्हणून ओळखली जाते. साहित्यप्रेमी तुम्हा आम्हा सर्वांची आहे. साहित्यप्रेमी प्रस्थापितांचे आणि नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ आणि मराठी साहित्यावर प्रेम करणा-या रसिकांचे विश्रांती स्थान आहे.